सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ - मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी
शिक्षणप्रसारक,समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
शिक्षणप्रसारक,समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
चरित्र
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील
असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री-स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या
समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत
सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फूल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल
घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले.
फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे
वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या
वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव
फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना
पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या
व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच
मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला.
सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना
इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना
प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन
मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
‘त्यांनी
केले ते माफ आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना
विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’.... या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा
मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच.
दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत
एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने
शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या
शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो
शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून
त्यांना सांगण्यात आले की "गोऱ्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील".
नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात
जोतिराव आणि सवित्रिबाइनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली
ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू
लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू
केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन
पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला....
जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर
शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत
हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली.
अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम
करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे
सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ
विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण
समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.
विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा
म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा
विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक
गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर
राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई
आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी
दत्तक घेतले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे
व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक
कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही
सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०)
सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार
त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी
लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला
सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना
दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी
मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने
धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे
कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित
करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी
प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.
त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची
सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाई
फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले (लेखिका : शैलजा मोलक)
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले (लेखक : ना. ग. पवार)
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले (लेखक : नागेश सुरवसे)
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
·
त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
·
साध्वी सावित्रीबाई फुले
(लेखिका : फुलवंता झोडगे)
·
सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
·
सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
·
सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
·
सावित्रीबाई फुले -श्रध्दा
(लेखक : मोहम्मद शाकीर)
·
सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
·
सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
·
सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
·
सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
·
’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती
अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
·
ज्ञान ज्योती माई सावित्री
फुले (लेखिका : विजया इंगोले)
·
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
(लेखिका उषा पोळ-खंदारे)
सावित्रीबाई
संमेलन/पुरस्कार
·
सावित्रीबाई फुले यांच्या
नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले
राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
·
सावित्रीबाई फुले यांच्या
नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
·
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा
सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून
दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका
समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
·
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई
फुले पुरस्कार
·
चिंचवडगाव येथील महात्मा फुले
मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
·
महात्मा फुले प्रतिभा संशोधन
अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
आदर्श शिक्षिका पुरस्कार
·
सावित्रीबाई फुले
महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे
स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
·
मराठी पत्रकार परिषदेचा
सावित्रीबाई फुले पुरस्कार
·
क्रांतिज्योती सावित्रीबाई
आदर्श शिक्षिका पुरस्कार
·
मध्य प्रदेश सरकारचा उत्तम
शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)